श्री संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य

..................................................................................................................................................................................................................................................

श्री संस्थानचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य

संतसत्पुरुषांच्या मांदियाळीमध्ये असणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजेच,  शेगांवचे श्री गजानन महाराज. श्रींनी त्यांच्या अवतारकार्याद्वारे अध्यात्ममार्गाचे पुनरुत्थान तर केलेच शिवाय भोळ्याभाबड्या सांसारिक जीवांना भावभक्तीचा लळाही लावला. आपल्या विविध लीलांमधून त्यांनी परमेश्वरीय तत्त्वाचा प्रत्यय दाखविला आणि वारी, दिंड्यांच्या माध्यमातून तो रुजविला देखील!

श्री गजानन महाराजांनी जोपासलेला आध्यात्ममार्ग नजरेसमोर ठेवून संस्थानच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाकार्याची वाटचाल होत आहे. वारकरी संप्रदायाची जोपासना व जडणघडण करीत असतानाच संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अद्वितीय अभ्यासक्रमातून ‘उद्याचा वारकरी‘ घडविला जात आहे. यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य याद्वारे संस्थानचे आध्यात्मिक कार्य जोमाने साकार झाल्याचे दिसून येते.

आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यामध्ये खालील सेवाकार्य अंतर्भूत आहे.

वारकरी शिक्षण संस्था

संस्थानातील धार्मिक कार्यक्रम/पालखी सोहळा

भजनी साहित्य वितरण

वारकरी प्रशिक्षण शिबिर

धार्मिक व आध्यात्मिक शिबिरे

वारकरी शिक्षण संस्था

वारकरी शिक्षण संस्था : श्री गजानन महाराज संस्थान व्दारा संचालीत वारकरी शिक्षण संस्था सन १९६७ मध्ये वै. श्री ह. भ. प. मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली.

उद्देश :-

संत वाङमयातील तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जनमानसांमध्ये भागवत भक्तीची, निति धर्माची, ज्ञानज्योत तेवत राहून समाजाला स्वदेश व स्वभाषा यांच्या कर्तव्याची जाणीव होवून समाज व्यसनमुक्त व्हावा व राहावा, बंधुभाव, सद्प्रवृत्ती नांदावी. पारमार्थिक संस्कार घडून संस्थेत शिक्षण घेतलेल्या प्रवचनकार, कीर्तनकार त्यांनी याच माध्यमातून लोकांचे आत्मकल्याण साधावे याच सद्उद्देशाने वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे.

वाचा बोलु वेदनिती ।
करू संती केले ते ।।

विद्यार्थी प्रवेश व पात्रता :

साधारणत : श्री रामनवमी उत्सवानंतर एप्रिल-मे कालावधी मध्ये १४ ते २० या वयोगटातील वर्ग ८ ते १० उत्तीर्ण विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जातो. संस्थेच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांचे घरातील वातावरण संस्कार संपन्न धार्मिक प्रवृत्तीने असावे. संत शिकवणीनुसार विद्यार्थ्यांना तुळशीमाळा धारण केलेली असावी, हा विचार लक्षात घेण्यात येतो.

निवास, भोजन, गणवेश व्यवस्था :-

संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास, भोजन, गणवेश, ग्रंथ, स्टेशनरी, आदी व्यवस्था संस्थेमार्फत सेवार्थ केली जाते.

अभ्यासक्रम व शैक्षणिक कालावधी :-

वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम हा ४ वर्षाचा असून विद्यार्थ्यांना संत वाङ्मय पाठांतर, संस्कृत व्याकरण, नारदभक्ती सूत्र, श्रीमदभागवतगीता, विचारसागर, पंचीकरण, श्री ज्ञानेश्वरी, प्रवचन, कीर्तन, वारकरी भजन, मृदंग वादन आदी विषयाचे शास्त्रशुध्द शिक्षण दिल्या जाते. जीवन उपजीवीकेचं साधन म्हणून विद्यार्थ्यांना याच कालावधीमध्ये शिवणकाम (शिलाई मशिन), मुर्तिकाम आदी शिक्षण दिले जाते.

अध्यापक वर्ग :-

वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरीता एकूण १० अध्यापक सेवक असून त्यांनी संप्रदायाच्या नियमानुसार विविध क्षेत्री ज्ञानार्जन करून पदविका प्राप्त केली आहे.

परीक्षा पध्दती :-

वारकरी संस्थेतील विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून २ (सहामाही, वार्षिक) परीक्षा संपन्न होतात. चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येते.


   

विद्यार्थी संख्या :-

आजरोजी विविध भागातून आलेले ६४ विद्यार्थी वारकरी शिक्षण प्राप्त करीत आहे. संस्थेतून बाहेर पडलेले अनेक गुणीजन विद्यार्थी विविध भागात जाऊन वारकरी सांप्रदायाचा प्रचार प्रसार करीत आहेत.

सन १९६७ ते २०२४ पर्यंत ७२२६ विद्यार्थ्यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतले आहे. यापैकी उत्कृष्ट प्रवचनकार, मृदंगवादक, गायक असे विद्यार्थीं तयार झाले असून पैकी २०० उत्कृष्ट कीर्तनकार आहेत.

 

दैनंदिन दिनचर्या :- 

संस्थानातील धार्मिक कार्यक्रम/पालखी सोहळा :-
संस्थानमध्ये वारकरी संस्थेच्या नित्यनियमानुसार दररोज 

गुरुवार, दशमीला श्रींच्या पालखीची मंदिर परीक्रमा सायंकाळी ५ ते ६ या वेळात संपन्न होते. 

संस्थानमध्ये प्रामुख्याने श्री प्रगटदिन, श्रीराम नवमी, श्री पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होत असतात. तसेच संतांचे, देवांचे उत्सव, जयंती, पुण्यतिथी उत्सव, श्री नवरात्रोत्सव, श्री जन्माष्टमी, श्रीमद् भागवत सप्ताह, श्री अधिकमास, श्री श्रावणमास इत्यादी उत्सव सुध्दा साजरे करण्यात येतात.

साधारणत: वर्षातून २०० कीर्तने, ३६५ प्रवचने, नैमित्तिक ४० प्रवचने तसेच श्री अधिकमास व श्री श्रावणमास मध्ये संपूर्ण महिनाभर कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम संपन्न होतात.